Sunday, 27 August 2017

CASUALTY OPD चा ताण

                  कुठल्याही शासकिय रूग्णालयात किरकोळ आजार असलेले रूग्ण ज्याना रूग्णालयात भरती होण्याची गरज नसते, अशा रूग्णांची तपासणी बाह्यरुग्ण विभाग :- Outdoor Patient Department (OPD) मध्ये केली जाते.सर्वसाधारणपणे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत व दुपारी ४ ते ६ ही  Morning व Evening OPD ची वेळ असते.या वेळात केसपेपर नोंदणी विभाग,औषधी विभाग,प्रयोगशाळा विभाग ,क्ष-किरण विभाग हे सर्व विभाग सुरू असतात.या वेळांव्यतिरिक्त किरकोळ आजारांचे रूग्ण तपासले जात नाहीत.बाकी गंभीर आजारी किंवा ज्यांना भरती करणे आवश्यक असते अशा रूग्णांसाठी Emergency Department :- तात्काळ विभाग २४ तास चालू असतो.
      परंतु गेल्या काही दिवसांपासून नियमित वेळांव्यतिरिक्तच्या Casualty OPD ची रूग्णसंख्या वाढलेली आहे. OPD च्या वेळेव्यतिरिक्त कुठल्याही वेळी किरकोळ आजाराचे रूग्ण येऊन गर्दी करतात.रविवारी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी तर तोबा गर्दी होते.यावेळी तात्काळ विभागात फक्त एक वैद्यकिय अधिकारी व एक अधिपरिचारिका कामावर असतात.त्यांना ही गर्दी आवरणे मुश्कील जाते.त्या दोघांची स्थिती चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी होते .त्यांना अत्यवस्थ रूग्ण सोडून या किरकोळ आजाराच्या रूग्णांना तपासत बसावे लागते.
         अपघात,सर्पदंश,बिषबाधा झालेले रूग्ण,बेशुध्द रूग्ण,प्रसूतीचे रूग्ण,कमी वजनाची बालके,न्युमोनियाची व डायरियाची बालके,गॅस्ट्रो,मलेरिया,डेंग्यू,टायफॉईड यासारख्या साथीचे रूग्ण यांची अव्याहतपणे २४ तास भरती होत असते अशात Casualty OPD मुळे तात्काळ विभागात नाहक गोंधळ होतो.
     अगदी वैद्यकिय महाविद्यालयाशी संलग्न रूग्णालयापासून तर प्रा.आ.केंद्रापर्यंत OPDच्या वेळा व वार पाळले जातात.सुटीच्या दिवशी OPD सरसकट बंद ठेवतात.रूग्णांनाही हे माहीत असते.मग आपल्या रूग्णालयातच OPD २४ तास का सुरू राहते? या २४ तास उपलब्धतेचा स्थानिक व जवळ राहणा-या रूग्णांकडून गैरफायदा घेतला जातो.आपली घरची कामे,जेवण खाण आटोपून हे रूग्ण आरामात कुठल्याही वेळी डोकेदुखी,अंगदुखी,सर्दी अशा किरकोळ आजारासाठी गर्दी करतात.दुपारी २ ते ४ किंवा संध्याकाळी ६ ते रात्री ११ या वेळात हे स्थानिक रूग्ण येतात.सदर वेळात फक्त एकच वैद्यकिय अधिकारी कामावर असतो.यावेळी जर आपले अधिकारी एखादा गंभीर रूग्ण तपासत असले तरी हे रूग्ण स्वत:ला लवकर तपासावे या साठी तगादा लावतात किंवा नाहक घाई करतात.त्यासाठी अधिपरिचारिका किंवा अधिका-यांशी वाद घालतात.स्वत:च्या सोयीनुसार इंजेक्शन किंवा सलाईनची लावण्याची मागणी करतात.अशावेळी CMO वाद टाळावे म्हणून असे रूग्ण पटापट तपासून त्यांना वाटेला लावतात.पण दिवसेंदिवस अशा रूग्णांचे संख्या वाढत आहे.कुठलीही रांग न लावता ५ मिनिटात  तात्काळ सेवा मिळवण्याचा हा सोपा उपाय आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहे.या सर्वांचा परिणाम तात्काळ विभागातील अत्यवस्थ रूग्णांना मिळणा-या उपचाराच्या गुणवत्तेवर होत आहे.त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवणे परिचारिका व वैद्यकिय अधिका-यांना शक्य होत नाही.
      लांबच्या खेड्यापाड्यातून मिळेल ते वाहन पकडून येणा-या गरीब रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास देण्यासाठी रूग्णालय कटिबध्द आहे. पण आरोग्य संस्थेतील कर्मचारी व अधिकारी यांना कर्तव्य शिकवणा-या लोकांना समाज म्हणून त्यांची जबाबदारी काय आहे हे सांगणेही तितकेच गरजेचे आहे. जिल्हाधिकारी,तहसिलदार ,प्रांत किंवा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अवेळी जाऊन काम न झाल्यामुळे कोणी गोंधळ घातल्याचे ऐकिवात नाही.पाणी कपातीच्या दिवशी कोणी नगरपालिकेत जाऊन जाब विचारत नाही. रस्त्यांची चाळणी झाली तरी कोणी बांधकाम विभागाकडे जाऊन कारण विचारत नाही. पण रूग्णालयात आल्यावर याच्यातला तथाकथित सुजाण नागरिक जागा होतो.मग तो आपल्याला कर्तव्याचे डोस पाजायचा प्रयत्न करतो.स्वत:ची नागरिक म्हणून काही जबाबदारी आहे याचा मात्र त्यांना सोईस्कर विसर पडतो. नियमांचा बडगा यांना दाखवावा लागेल.अन्यथा अति कामाच्या ताणाचे विपरीत परिणाम अधिका-यांवर व कर्मचा-यांवर होऊन आपली यंत्रणा डळमळीत होऊन आपल्या रूग्णालयाची अवस्था ग्रामीण रूग्णालय मोखाडा किंवा विक्रमगड सारखी  दयनीय व्हायला वेळ लागणार नाही.

Tuesday, 15 August 2017

एका रक्तपेढीची शोकांतिका

             सुमारे १७-१८ वर्षापूर्वी पतंगशाह कुटीर रूग्णालय ५४ खाटांचे असताना येथिल अतिदुर्गम भागातील रूग्णांची गरज लंक्षात घेऊन शासनाने रक्तपेढी सुरू केली.१४-१५ वर्षे अनंत अडचणी येऊनही ही रक्तपेढी चालू राहिली.कालांतराने रूग्णालय १०० खाटांचे झाले.प्रसूती व इतर रूग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली.त्याच हिशोबाने रक्ताची गरज असलेले रूग्णही वाढले.जवळपास शासकिय रक्तपेढी कुठेच नाही.जवळात जवळ नाशिक जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी ८० किलोमीटर , सिलव्हासा जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी ६५-७० किलोमीटर आणि ठाणे जिल्हा रूग्णालय रक्तपेढी तर ११०-१२० किलोमीटर ऐवढ्या दूरच्या अंतरावर आहे.या अशा बिकट परिस्थितीत पतंगशाह कुटीर रूग्णालयाच्या रक्तपेढीमुळे हजारो रूग्णांचे प्राण वाचले.रक्तसाठा नेहमी कमी पडायचा ,परंतु तरीही इकडे तिकडे जमेल त्या शाळा,कालेज किवा अगदी वाढदिवसा निमित्त वगैरे रक्तदान शिबीर आयोजित करून ही रक्तपेढी चालू होती.मनुष्यबळाचा अभाव,तज्ज्ञ रक्तसंक्रमण अधिका-याची वानवा,जुनी इमारत या बरोबरच अन्न व औषधी विभागाने घालून दिलेल्या अनेक कठोर निकषांची पूर्तता न केल्यामुळे या रक्तपेढीचा परवाना जून २०१४ ला रद्द केला गेला.त्या ऐवजी तात्पुरती सोय म्हणून ठाणे जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीच्या मदतीने रक्त साठा केंद्र सुरू करण्याची शिफारस अन्न व औषधी विभागाने केली.७-८ महिन्याच्या महत्प्रयासानंतर हे रक्त साठा केंद्र सुरू झाले.परंतु हे केंद्र सर्वस्वी ठाणे जिल्हा रूग्णालयाकडून मिळणा-या रक्त पिशव्यावर अवलंबून असते.१५-२० दिवसातून एक वेळा ज्या १०-१२ रक्तपिशव्या मिळतात त्या त्यांच्याकडे असलेल्या उपलब्धते नुसार मिळतात,आपल्या गरजेनुसार मिळत नाहीत.शिवाय आपण त्यांच्या परवानगी व सहकार्याशिवाय रक्तदान शिबीर आयोजित करू शकत नाही. एकूण काय तर स्वायत्त रक्तपेढीला असलेले अधिकार आपल्याला नाहीत.
            रक्तक्षयाच्या रूग्णांची संख्या लक्षात घेता दर महिन्याला आपल्याला ५०-६० रक्त पिशव्यांची गरज असते.म्हणजे रोज सरासरी दोन.परंतु आपल्याला मिळणा-या २०-२५ रक्तपिशव्यांवर गुजराण करावी लागते.आणीबाणीच्या वेळी रक्त उपलब्ध नसल्यास रक्त नाशिक किंवा पालघरच्या खाजगी रक्तपेढीतून प्रत्येक पिशवीमागे किमान २०००-२५०० रूपये खर्चून मागवावे लागते.परंतु ८०% रूग्णांना हे परवडत नाही.यासाठी आपल्या येथे सुसज्ज रक्तपेढी असणे गरजेचे आहे.जिथे आपल्याला रक्तपिशव्याचा जास्त साठा करता येईल.तसेच संपूर्ण रक्ता व्यतिरिक्त प्लाझमा,प्लेटलेट व पॅक सेल्स आदि रक्ताचे घटक साठवता येतील.तसेच कधीही ऐच्छिक रक्तदान घेता येईल.सुसज्ज यंत्रसामुग्री असल्यास रक्ताच्या संक्रमण करण्या आधीच्या विविध तपासण्या आपल्या येथेच करता येतील.सुदैवाने रोटरी इंटरनॅशन या NGO च्या लंडन व मुंबई या शाखांमार्फत सर्व अद्ययावत सामुग्री आपल्या प्रस्तावित नवीन रक्तपेढीसाठी मंजूर झाली आहे.याशिवाय सुसज्ज Blood Donation Van सुध्दा देण्याचे त्यांनी ठरवले आहे.परंतु कर्मदरिद्रीपणामुळे आपल घोड मात्र आहे तिथेच अडल आहे.
           नवीन रक्तपेढीच्या बांधकामाचा प्रस्ताव ५-६ वर्षापूर्वीच मंजूर झाला आहे.बांधकामासाठी जागेचे हस्तांतरण ४ वर्षापूर्वीच झाले आहे.प्रत्यक्ष काम सुरू होऊन साडेतीन वर्षे झाली आहेत.परंतु अजूनही या इमारतीचे १००% टक्के काम पूर्ण झालेले नाही.तळमजल्यावर रक्तपेढी व पहिल्या मजल्यावर प्रयोगशाळेचे नियोजन आहे.पहिल्या मजल्यावर स्लॅब मंजूर नाही ,पत्रे व फाल सिलिंग आहे.या एवढ्याशा कामाला जे सहा महिन्यात किंवा जास्तीत जास्त एक वर्षात व्हायला हवे, त्याला तीन वर्षापेक्षा जास्त अवधी लागला आहे.यावरून संबधित विभागाची कार्यतत्परता दिसून येते.तसेच हे काम हाती घेणा-या कंत्राटदाराचे सामाजिक भान व रूग्णांविषयीची कळकळ दिसून येते.एखाद्या रस्ताचे ,पूलाचे किंवा इतर सरकारी इमारतींचे बांधकाम वर्षानुवर्षे रखडवण्याचा जसा यांचा नेहमीचा पायंडा आहे,तोच पायंडा त्यांनी रक्तपेढीसारख्या आरोग्याशी निगडीत आणि विशेष म्हणजे रूग्णांच्या जीवन मरणाशी थेट संबधित असलेल्या कामाला लावावा ही दुर्देवाची बाब आहे.आधीच आपल्याकडे परिपूर्ण आरोग्य सुविधा असलेले मोठे दुसरे कुठलेही रूग्णालय जवळपास नाही. करोडपतीपासून तर दारिद्र्यरेषेखालील मजूरापर्यंत सर्वांना आणीबाणीच्या उपचारासाठी येथेच धाव घ्यावी लागते. त्यात या व्यवस्थेतील झारीतले शुक्राचार्य मंजूर कामेही धडावर नि वेळेत करत नसतील तर आमच्या भागात विकास किंवा सुधारणा होत नाहीत अशी बोंब मारण्यात काय अर्थ आहे? कंत्राटदारी व्यतिरिक्त राजकारण हा जोडधंदा असलेले लोकच बेंबीच्या देठापासून आदिवांसींवर अन्याय होतोय,सरकारचे दुर्लक्ष होतेय, आदिवांसी भागाचा विकास होत नाही असे रडगाणे रडतात.चांगले रस्ते,चांगल्या शाळा, भक्कम पूल, गावागावातली नळपाणी योजना,शेती साठी धरणे आदी पायाभूत सुविधांची कामे  घेणारे बहुतांशी लोक उपरे नसतात,इथलेच असतात.मग हे काम रेंगाळले तर दोष कोणाला द्यायचा?  बर या विषयावर आवाज उठवायला कुपोषणास्नेही माध्यमांना किंवा उपोषणस्नेही तथाकथित समाजसेवकांना वेळ नाही.
    सदर काम पूर्ण झाले की नाही? कधी पूर्ण होणार?  ऐवढा उशिर का लागतोय? यांची चौकशी नित्यनेमाने व उत्सुकतेने इंग्लंडच्या रोटरी इंटरनॅशनलचा महिंद्र ढाल नावाचा ८० वर्षांचा उत्साही तरूण आणि पश्चिम मुंबई रोटरीचे धडाडीचे माजी गव्हर्नर डॅा .बाळ इनामदार गेल्या ४ वर्षापासून अव्याहतपणे करत असतात.ज्यांच्याकडून आपल्या रक्तपेढीसाठी सर्व यंत्रसामुग्री दान म्हणून मिळणार आहे.त्यांच्या भाबड्या प्रश्नांना उत्तर देताना मला एकूणच आपल्या गेंड्याची कातडी असलेल्या व्यवस्थेची लाज वाटते.या माणसांना एवढ्या दूर राहूनसुध्दा आपल्या समाजासाठी काही करायची उर्मी आणि धडपड आहे.आणि आपण मात्र हताशपणे निर्ढावलेल्या कोडग्या व्यवस्थेत संवेदना गमावत चाललोय.
      कविवर्य ग.दि.माडगूळकरांच्या शब्दात सांगायचे तर हेच शब्द आठवतात-“देण्या-याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी.”

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...