Sunday, 24 September 2017

१०८ चा पांढरा हत्ती

                              गेल्या चार वर्षांपासून आपल्याकडे १०८ ही विशेष रूग्णवाहीका सेवा सुरू झाली आहे.या रूग्णवाहीकेचे वैशिष्टय म्हणजे रूग्ण रूग्णालयात संदर्भित करत असताना डाक्टर सोबत राहतील.ही रूग्णवाहीका Oxygen,Emergency Medicine, Pulse Oximeter  व छोट्या ventilator आदी सुविधांनी सुसज्ज असणे अभिप्रेत आहे.अत्यवस्थ व गंभीर आजाराच्या रूग्णांची संदर्भित होत असताना हेळसांड होऊ नये हा यामागे मूळ हेतु आहे.शिवाय रात्री अपरात्री घरून विशेषत: लांबच्या खेड्यापाड्यातून रूग्णालयात येण्यासाठी वाहन मिळणे दुरापास्त,अशा वेळी कोणालाही डाक्टरांसह रूग्णवाहीका घरी येऊन रूग्णाला रूग्णालयात घेऊन जाणे म्हणजे ही पाश्चात्त्य किंवा विकसित देशातील तत्पर व अद्ययावत रूग्णवाहीका सेवे सारखी आकर्षक सेवा वाटेल.जवळपास सर्वच तालुक्यात किमान दोन ॲम्ब्युलन्स मिळाल्या आहेत.अतिदुर्गम भागाला विशेष प्राधान्य दिले गेले आहे.पण खरच या सेवेमुळे संदर्भ सेवा बळकट झालीय का? या ॲम्ब्युलन्सवर असणा-या डाक्टरांचा खरच काही उपयोग होतो का?
    दुर्देवाने वस्तुस्थितीत विशेष काही फरक पडलेला नाही.पहिली गोष्ट म्हणजे १०८ नंबर वर फोन केल्यावर तो लागेलच याची हमी नसते.लागलाच तर समोरून सीबीआय सारख्या तपास यंत्रणा
सुध्दा विचारत नसतील ऐवढे चिकित्सक प्रश्न विचारले जातात.त्यांनंतर उपलब्ध असलेल्या जवळच्या  रूग्णवाहीकेच्या डाक्टरांशी बोलणं करून देण्यासाठी किमान १५ मिनिट किंवा कधी कधी ३० मिनटे प्रतिक्षा करावी लागते.तस पाहील तर डाक्टरांशी संपर्क होणे हे काम फक्त ५ मिनीटात व्हायला हवे.बरेचदा ॲम्ब्युलन्स रूग्णालयाच्या आवारातच असते.रूग्णवाहीकेचा चालक आसपासच दिसतो ,मग नेमके डाक्टर कुठे गडप झालेले असतात कुणास ठाऊक? की ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क व्हायला १५-२० मिनिटे लागावीत ? डाक्टरांशी संपर्क झाल्यावर मग अमुक ठिकाणीच का न्यायच आहे,तमुक ठिकाणी का नाही? बेड बुक केला आहे का? सिव्हील सर्जनची सही आहे का ? असे अडथळावजा प्रश्न या डाक्टरांकडून विचारले जातात.मुळात या डाक्टरांच्या कुवतीवर शंका घेण्यास वाव आहे.या सेवेवर भरती केलेले डाक्टर आयुर्वेदाचे आहेत. त्यांच्या पथीबाबत आक्षेप असायचे कारण नाही.पण केवळ प्रॅक्टिस करून ज्यांचा उदरनिर्वाह होत नाही,मुख्यत्वे त्यांनीच ही १०८ ची नोकरी जोडधंदा म्हणून पत्करली आहे.  त्यांना रूग्ण संदर्भित करत असताना अत्यवस्थ रूग्णांवर उपचार (Emergency Medical Services )करायचे विशेष वेगळे प्रशिक्षण वगैरे दिल्याचे ऐकिवात नाही.किंबहुना त्यांना दिलेल्या Emergency Medicine चे account तपासल्यास ९९% औषधी या वापरल्या गेल्या नसतील याची १००%  खात्री बाळगण्यास काहीच हरकत नाही.मुळात रूग्ण संदर्भित करत असताना त्यातही विशेष करून गंभीर आजार असलेल्या रूग्ण संदर्भित करत असताना डाक्टरांनी रूग्णासोबत बसणे अपेक्षित आहे.मात्र जवळपास सर्वच डाक्टर रूग्णवाहीकेत पुढे ड्रायव्हर शेजारी बसतात.म्हणजे रूग्ण डाक्टरांच्या देखरेखीखाली संदर्भित होणे या पहिल्या उद्देशालाच हरताळ फासला जातो.जर प्रत्येक रूग्णाबाबत असे होत असेल तर मग प्रत्येक रूग्ण वाहीकेवर २-३ डाक्टर नेमण्याची व त्यांच्या वेतनावर ख्रर्च करण्याची काहीच गरज नाही.काही महाभाग तर रूग्णासोबत जातच नाहीत.विशेषत: रूग्ण जर घरून आणायचा असेल तर ड्रायव्हलाच पाठवतात.रूग्णाला रूग्णालयाजवळ आणल्यावर मग रूग्णवाहीकेत चढतात.तर काही महाराजांना अत्यवस्थ रूग्ण घेण्यासाठी रूग्णालयात येणेही जीवावर येते.त्यांचे ड्रायव्हर पहिल्यांदा रूग्ण गाडीत चढवून घेतात व नंतर डाक्टरांना त्याच्या घरी आणायला अम्ब्युलन्स घेऊन जातात.काही जण तर यापेक्षाही सुपीक डोक्याचे असतात.लांबच्या रूग्णालयात न्यायचा रूग्ण थेट संदर्भित केलेल्या रूग्णालयात न नेता मार्गावरील मधल्या गावातील एखाद्या दुस-या १०८  च्या रूग्णवाहीकेला सोपवून येतात.त्यांच्या भाषेत रूग्णाला दुस-या १०८ मध्ये रिले (Relay)करतात.यात Serious असलेल्या रूग्णाचे विनाकारण चढण्या उतरण्यामुळे अतोनात हाल होतात.
   प्रसूती झालेले रूग्ण,कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेले रूग्ण घरी सोडण्यासाठी या १०८ सेवेचा काडीचाही उपयोग होत नाही. Call नसताना OPD च्या वेळेत डाक्टरांनी रूग्णालयात थांबून OPD ला मदत करावी असे वरिष्ठांचे आदेश सोईस्करपणे धाब्यावर बसवलेले आहेत.दुसरा अनिष्ट परिणाम म्हणजे ज्या प्रा.आ.केंद्रांना जवळ १०८ ची सुविधा उपलब्ध आहे ,त्यांनी रात्री आलेले सरसकट सगळे रूग्ण १०८ मध्ये बसवून RH किंवा SDH ला संदर्भित करायचे असतात असाच ठाम समज करून घेतला आहे.त्यामुळे PHC वरून अनावश्यक रेफरल वाढले आहेत.अजून एक दुष्परिणाम म्हणजे रात्री अपरात्री संदर्भसेवेसाठी १०८ असते, या गृहीतकामुळे SDH किंवा RH चे ड्रायव्हर रात्री सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.कधी कधी तर  रूग्णालयाच्या आवारात ४-५ ॲम्ब्युलन्स दिसतात परंतु रूग्णासाठी एकही ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही.म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.
SDH च्या रूग्णवाहीकांबाबत निदान वैद्यकिय अधिक्षक जबाबदार असतात.त्याबाबत वरिष्ठांकडून नियमित लेखापरिक्षण होते.पण १०८ बाबत तर कुणाकडे काही तक्रार करायची सोय नाही.कारण यांचे कंत्राट खाजगी कंपनीस दिलेले आहे. त्यामुळे १०८ च्या District Manager ला manage करून काहीही क्षुल्लक कारण दाखवून गाडी बंद दाखवायची नि घरी झोपा काढायच्या असे प्रकार वारंवार होतात. यावर जालीम उपाय म्हणजे या डाक्टर व ड्रायव्हरांना संदर्भित केलेल्या रूग्णसंख्येनुसार किंवा गाडीने कापलेल्या अंतरानुसार जर वेतन दिले तरच १०८ या रूग्णवाहीका सेवेचे काम सुरंळीत व पूर्ण क्षमतेने होईल.नाहीतर बिनकामाचा हा पांढरा हत्ती पोसणे कठिण जाईल.          

Tuesday, 5 September 2017

सोनोग्राफीच वेड

              गेल्या दिड वर्षापासून आपल्या जव्हार कुटीर रूग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू झाली. येथिल रूग्णांची गरज लक्षात घेऊन आरोहण या संस्थेमार्फत सिमेन्स या कंपनीकडून सोनोग्राफीचे मशिन दान करण्यात आले.नंतर त्यांनी सतत पाठपुरावा करून नाशिकहून आठवड्यातील एक दिवसासाठी सोनोग्राफी तज्ज्ञाची सोय करण्यात आली.जव्हार,विक्रमगड व मोखाडा येथिल गरोदर मातांची दर बुधवारी कुटीर रूग्णालयात सोनोग्राफीसाठी झुंबड उडते.कधी कधी तर ८०-१०० रूग्ण सोनोग्राफीसाठी जमतात.सोनोग्राफी तज्ज्ञ दुपारी २ पासून शेवटच्या रूग्णांची सोनोग्राफी होईपर्यंत थांबतात. ४-५ तासात ७०-८० रूग्णांची सोनोग्राफी करण्याच शिवधनुष्य ते लिलया पेलतात.पण दुर्देवाने या तोबा गर्दीमुळे आता हळू हळू सोनोग्राफीच्या रिपोर्टच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे.
      एखाद्या रूग्णाची सोनोग्राफी केल्यावर सदर गरोदर मातेच्या,आरोग्यसेविकेच्या व आशा कार्यकर्तीच्या मनांत (False Security) खोटी सुरक्षा निर्माण होते.सोनोग्राफी केली,रिपोर्ट व्यवस्थित आला ,आता आपली जबाबदारी संपली असे आशा व आरोग्यसेविकेला वाटते.तर गरोदर मातेलाही त्यानंतर नियमित पोटावरून तपासणी करण्याची गरज वाटत नाही.मग हे रूग्ण एकदम प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर रूग्णालयात धाव घेतात.त्यातील काही रूग्णांनी दोन तीन वेळा सोनोग्राफी केलेली असते.परंतु  डाक्टरांकडून नियमित तपासणी मात्र अजिबात झालेली नसते.त्यामुळे अचानक काहातरी गुंतागुंत उद्भवते.उदाहरणार्थ खालील घडलेल्या काही सत्य घटना-
 १)एक दुस-या खेपेच्या मातेने आठव्या महिन्यात सोनोग्राफी केली. बाळ पायळू म्हणजे Breech Presetation  होते.रिपोर्ट कोणालाही न दाखवता ती निर्धास्त राहीली.एका रात्री तिला वेदना सुरू झाल्या.दुसरी खेप असल्याने तिने घरीच दाईकडून प्रसूती करण्याची ठरवल.साडेतीन किलो  वजनाच्या पायाळू बाळाची अप्रशिक्षित दाईला घरी प्रसूती करणे जमले नाही.बाळाचे पाय बाहेर व डोके अडकेल्या स्थितीत तिला कुटीर रूग्णालयात आणले जिथे प्रसूती झाली परंतु तोपर्यंत बाळ दगावले होते.
२) एका रूग्णाने नऊ महिन्यात तब्बल तीन वेळा सोनोग्राफी केली होती.प्रत्येक सोनोग्राफीत प्रसूतीची तारीख पुढची दाखवल्याने ती गोंधळली.दिवस उलटून गेल्यावर १५ दिवसानंतर ती बाळाची हालचाल होत नव्हती म्हणून तपासाण्यासाठी आली.पाणी कमी होऊन बाळ आतच दगावले होते.(Severe Oligohydramnios ,Intrauterine Foetal Death )
३) दुसरी एक रूग्ण नववा महिना लागल्यावर अंगावरून रक्त जाते म्हणून भरती झाली.तपासल्यावर असे कळले की बाळाची वार ( Placenta Previa ) पिशवीच्या तोंडावर होती.जे सहाव्या महिन्यात केलेल्या सोनोग्राफीत दिसले नव्हते.
४) एका रूग्णाची ५ व्या महिन्याची सोनोग्राफी Normal होती.परंतु प्रसूतीनंतर बाळाच्या पाठीच्या मणक्यात दोष व कण्यावर गाठ (Spina Bifida ,Meningomylocele )होती.जी सोनोग्राफीत दिसली नव्हती.
        यात तस म्हटल तर चूक कोणा व्यक्तीची नाही.चूक आहे आपण निर्माण केलेल्या  सोनोग्राफीच्या व्यवस्थेची आणि रूग्णांच्या अज्ञानाची.एक साधी सोनोग्राफी (Routine Obstetric Ultrasound) करायला किमान १० मिनटे व रिपोर्टींगला ५ म्हणजे एकूण १५ मिनीटे लागतात.म्हणजे तासाला फक्त ४-५ सोनोग्राफी होऊ शकतात.म्हणजे ५ तासात २५ रूग्णांच्या सोनोग्राफी होऊ शकतात.इथ सोनोग्राफी तज्ज्ञांना आपण पाच- सहा तासात ७०-८० रूग्णांची सोनोग्राफी करायला भाग पाडतो.म्हणजे ४-५ मिनीटांत एक सोनोग्राफी.या ४-५ मिनीटात संपूर्ण सोनोग्राफी करणे शक्य नाही.यामुळे घाई गडबडीत केलेल्या सोनोग्राफी तांत्रिक चुका होण्याची शक्यता बळकावते.मग वर उल्लेख केलेल्या घटना घडतात.
        दुसरा मुद्दा म्हणजे सोनोग्राफी का करायची असते या बद्दल असलेले रूग्णांचे,आशांचे,आरोग्यसेविकांचे आणि अगदी नवख्या वैद्यकिय अधिका-यांचे असलेले अज्ञान.कोणतेही तंत्र त्याचे जसे फायदे असतात ,तशाच मर्यादासुध्दा असतात.म्हणून हे सोनोग्राफीचे तंत्र जपून वापरायला हवे.तशी गरोदर मातेची सोनोग्राफी करण्याची २०-२१ कारणे आहेत.परंतु महत्वाची कारणे म्हणजे गर्भाची संख्या,गर्भाची वाढ,गर्भाची अवस्था,  गर्भाभोवतालचे पाणी,वारेची जागा,गर्भाचे वजन,गर्भाचे ठोके,गर्भातील व्यंग ही असतात.Routine Sonography त बाळाच्या डोक्याचा घेर व व्यास ,मांडीच्या हाडाची लांबी  व पोटाचा घेर मोजून गर्भाची वाढ आठवड्यात मोजतात.या व्यतिरिक्त इतर सोनोग्राफी खालील प्रमाणे करतात.
पहिल्या तीन महिन्यात (१२ आठवड्याच्या आत) केलेल्या सोनोग्राफी Dating Sonography असते.कारण यात आलेली प्रसूतीची अपेक्षित तारीख बिनचूक निघते.
१० व्या आठवड्या दरम्यान केलेल्या सोनोग्राफी Nuchal Translucency Scan असतो.यात गर्भाच्या मानेचे मोजमाप करून डोक्याच्या व पाठीच्या मणक्याच्या जन्मजात व्यंगांचे निदान करता येते.
१६-१८ आठवड्यात Anomaly Scan /Malformation Scan करून गर्भातील मोठी शारिरीक व्यंगे शोधता येऊ शकतात.
२४-२६ आठवड्यात Foetal 2D Echo करून गर्भाच्या ह्रदयात दोष (जन्मजात ह्रदय रोग)आहे की नाही याची खातरजमा करता येते.
३२ आठवड्यांच्या पुढे Biophysical Profile ही बाळाची हालचाल व श्वसनाचे मुल्यमापन करता येणारी सोनोग्राफी करता येते.किंवा Colour Doppler ही बाळाला मातेकडून होणा-या रक्तपुरवठ्याचे प्रमाण मोजता येईल अशी सोनोग्राफी करता येते.
 दुर्देवाने आपल्याकडे मात्र गरोदर मातेच्या पोटात दुखत असेल,कंबर दुखत असेल,खूप उलट्या होत असतील,पोटात खूप हालचाल होते असेल तर रूग्ण स्वःता येतात किंवा आशा/ANM/MO  त्यांना सोनोग्राफीला पाठवतात.किंवा कारण नसताना रूग्णाला दोन किंवा तीन वेळा सोनोग्राफी करायला लावतात.त्यातल्या त्यात मोखाड्याच्या रूग्णांच्या डोक्यात जर सोनोग्राफीच भूत गेल तर जोपर्यंत सोनोग्राफी होत नाही तोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही. सोनोग्राफी करून पोट किंवा कंबर दुखणे थांबत नाही हे पहिल्यांदा आपल्या कर्मचारी-यांनी नीट समजून घ्यायला हव नि रूग्णांना पटवून द्यायला हव.तसेच पाचव्या सहाव्या महिन्यात सोनोग्राफी Normal आली म्हणजे पुढे काहीही गुंतागुंत होणारं नाही याची हमी नसते.सोनोग्राफी हा नियमित प्रसूतिपूर्व तपासणीचा पर्याय नाही. पहिल्या पाच महिन्यानंतर सोनोग्राफीवरून काढलेली प्रसूतीची अपेक्षित तारीख बिनचूक नसते.सोनोग्राफीत आठव्या महिन्यापर्यंत दाखवलेली गर्भाची  Position सतत बदल असते.
  वरील सर्व बाबी लक्षात घेऊन कोणाची सोनोग्राफी करायची नि कोणाची नाही याचा सांगोपांग विचार प्रत्येकाने करून मगच रूग्ण पाठवायला हवेत.जोखमीच्या मातांना सोनोग्राफीसाठी आधी प्राथमिकता द्यायला हवी. सर्व प्रा.आ. केंद्रांनी एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार रूग्ण पाठवायला हवेत.एकावेळी ४० पेक्षा जास्त रूग्ण जमा होऊ नयेत अशी व्यवस्था करायला हवी. सोनोग्राफीचे तज्ज्ञ प्रसूती करणार नसतात.रिपोर्ट पाहून प्रसूती डाक्टर किंवा ANM/GNM ला करायची असते. सोनोग्राफी हा गरोदर मातेचा उपचार नाही.ती एक निदान करण्याची पध्दत आहे.तिचा योग्य वापर केला तरच तिचा सुलभ प्रसूतीसाठी उपयोग होईल. केवळ मोफत होते म्हणून सरसकट गावतल्या सगळ्यांची सोनोग्राफी करून संख्या वाढेल पण गुणवत्तेच काय?

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...