Wednesday, 12 July 2017

कुपोषण देगा देवा

           जून महिन्यात 'नेमेचि येतो मग पावसाळा ' ही उक्ती इथे 'नेमेचि येते मग कुपोषण' अशी वापरायला हवी.दिवाळी झाल्यावर कुपोषण हा शब्द कमी वेळा बोलण्यात,ऐकण्यात किंवा वाचण्यात येतो.मग जून मध्येच एखाद्या संसर्गजन्य आजाराच्या उद्रकासारखा हा शब्द ऐकिवात येतो.सर्व सरकारी व बिगर सरकारी यंत्रणा युध्द पातळींवर कामाला लागूनही कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण हवे तेवढ्या प्रमाणात कमी होत नाही.याचे प्रमुख कारण म्हणजे करण्यात येणा-या जवळपास सर्व उपायात कुपोषण झाल्यावर त्यावर पोषण करून इलाज करण्यावर जास्त भर दिला गेला आहे.पण प्रतिबंधावर जास्त भर दिला गेलेला नाही.
              प्रतिबंधाची सुरवात किशोरवयीन मुलींपासून करावी लागेल , वयं वर्षे ११ ते १९ वयोगटातील मुलींच्या पोषणावर लक्ष द्यावे लागेल.या वयोगटातील ३०-३५ किलोच्या मुली  ३ किलोच्या सुदृढ बालकाला जन्म देऊ शकत नाहीत.गर्भारपणात या मुलींचे वजन फक्त ४-५ किलोच वाढते.इथूनच गर्भाच्या कुपोषणाची सुरवात होते.१८ वर्षाखालील मुलींची लग्ने अथवा गर्भारपण राहू नये यासाठी सामाजिक व राजकीय प्रयत्न होताना दिसत नाहीत,किंबहुना तशी राजकीय समज व इच्छाशक्ती कोणत्याही राजकीय पक्षात नाही. ब-याच बिगर सरकारी सामाजिक संस्था येथे काम करत आहेत ,परंतु या विषयावर कोणीही काम करत नाही.सरकारी पातळीवर ARSH-Adolescent Reproductive Sexual Health हा कार्यक्रम चालू आहे,परंतु  वेगळ्या मनुष्यबळाअभावी व्यापक प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नाही.
               दुसरा महत्वाचा मुद्दे म्हणजे शिक्षण.इयत्ता दहावी पर्यंत शाळेतून गळती होणा-या मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे.प्राथमिक शाळेतून गळती झालेल्या मुली पुढे पडेल ते काम करून कुटुंबाला मदत करतात.त्यातच त्यांची १८ वर्ष पूर्ण होण्याआधी लग्न किंवा Mutual Living Relationship मध्ये गुरफटतात.किमान १० वी किंवा १२ वी पास असलेल्या मुली स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याच्या बाबतीत सजग असतात.त्यामुळे या कुटुंबात कुपोषणाचे प्रमाण नगण्य असते.त्यामुळे सर्व शिक्षा अभियान जर सर्व मुलींपर्यंत पोचले तर कुपोषणाचा आपोआप प्रतिबंध होईल.
              तिसरीत मु्द्दा आहे आहे,रोजगार व दळणवळणाचा.इथेच रोजगार निर्माण करायचा असेल तर बागायती शेतीला प्राधान्य द्यावे लागेल.पाणी साठवून भात व नाचणी व्यतिरिक्त इतर पिके घेण्यावर भर द्यावे लागेल.या शेतमालासाठी मुंबई ,ठाण्यापेक्षा तुलनेने जवळ असलेल्या सिलवासा किंवा नाशिक या बाजारपेठा जवळ आहेत.ही दोन्ही शहरे अद्ययावत महामार्गाने जव्हारच्या अजून जवळ येऊ शकतात. मुंबईला जाण्यात ३-४ तास घालवण्यापेक्षा एक तासात सेलवास,दिड तासात वापी किंवा नाशिक हे जास्त सोईस्कर होईल.ही शहरे जवळ आली तर तिथल्या उद्योगाला येथिल मनुष्यबळ पुरवतां येईल. रोजगारासाठी लांबवर स्थलांतर कराव लागणारे नाही.पण दुर्देवाने  रस्ते  हवे तेवढे चांगले नाहीत.
                आहे त्या परिस्थितीत वर्षोनुवर्षे राहून इथल्या लोकांची जगण्यासाठी संघर्ष करण्याची इच्छाच  नाहीशी झालेली दिसत.जीवनमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्व प्रयत्न करण्याची उर्मी या समाजात नाही.अस्वच्छ पाणी पिऊन  हागवण झालेले रूग्ण बरे झाल्यावर निदान घरी जाऊन पाणी गाळून उकळून पाणी पिणे अपेक्षित असते  परंतु दुर्देवाने असे  अजून तरी होत नाही. तसेच विविध सरकारी योजनांनी हे लोक इतके परावलंबी झाले आहेत की स्वःताचे आरोग्य सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे असा  यांचा ठाम समज आहे. कुपोषित बालक वजन वाढण्यासाठी NRC-Nutrition Rehabilitation Centre ला भरती केल्यास बुडीत मजुरी मिळते. काम न करता केवळ भरती करण्याचे पैसे मिळतात म्हणून बालके भरती केली जातात.या पैशांचा विनीयोग दारू पिण्यासाठी केला जातो.मोफतच्या औषधी,अन्न व पैशांच्या मदतीने आरोग्याबाबत कमालीची बेफिकीरी व अनास्था आहे.लग्न,साखरपुडा  किंवा बोहाडा या वेळी दारू,ताडी,मानपान किंवा रितीरिवाज यावर खर्च करणे जेवढे अत्यावश्यक मानले जाते ,तेवढे लहान बालकांच्या जेवणा खाण्यावर लक्ष देणे त्यांना गरजेचे वाटत नाही.
      दरवर्षी कुपोषणामुळे प्रसारमाध्यमांचे  मात्र चांगलेच पोषण होते.त्यांच्यात आकडेवारीची मग स्पर्धा लागते. फोटो काढण्यासाठी जास्त हडकुळ्या दिसणा-या बालकाचा हटकून शोध घेतला जातो.मग चित्र असे काही रंगवले जाते की इथली ९०% बालक कुपोषित आहेत.हे सगळं कमी की काय म्हणून एखाद्या चांगल्या वजनाच्या बालकाला रुग्णालयात इतर आजारासाठी जेव्हा भरती केले जाते व जेव्हा बुडीत मजुरी मिळत नाही तेव्हा त्याचे पालक कुरकुरतात  की -"असा  कसा पैसे त मिळायलच पायजत,कुपुसित आहे तो'!"

2 comments:

  1. Right points. I also working in trible area since last 12 years as Lab Tech. And getting the same experience as you I agree with you.

    ReplyDelete
  2. Good observations and perfect solution
    पण करणार कोण ?
    चाललेय असेच...
    निरंतर.......

    ReplyDelete

प्रसूतीपश्चात तांबी कार्यक्रमाची तोकडी लांबी

                     फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळात अरब व्यापारी लोक एका वाळवंटी प्रदेशातून दुस-या प्रदेशात आपल्याकडील उंटांच्या ताफ्यासह...